‘फी’चा भरणा न केल्याने शाळांनी पाठविल्या विद्यार्थ्यांच्या घरी टीसी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9819*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

235

‘फी’चा भरणा न केल्याने शाळांनी पाठविल्या विद्यार्थ्यांच्या घरी टीसी

विदर्भ वतन, नागपूर : आॅनलाईन शिक्षण सुरू असतानाही शाळांकडून वारेमाप फी आकारण्यात येत असल्याने पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून त्यांचे या फी वाढिविरोधात आंदोलन सुरूच आहे. हे सर्व सुरू असतानाच आता शहरातील काही नामांकित शाळांनी स्कूल फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरी चक्क त्यांच्या टीसी पाठविल्या आहेत.
त्यामुळे पालक चांगलेच संतप्त झाले असून, कोरोना महामारीच्या काळात शाळा प्रशासनाकडून पालकांची होत असलेली पिळवणूक थांबविण्यासाठी जागरुक पालक परिषदेने शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांची भेट घेतली. त्यांनी गुरुवारला सकाळी ११ शिक्षण उपसंचालक कार्यालयात बैठकीस येण्याचे पालकांना सांगितले. परंतु अधिकारीच आले नसल्याने संतप्त पालकांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले.
पालक संघटनांनी वंजारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पालकांना गुरुवारला सकाळी ११ वाजता उपसंचालक कार्यालयात बैठकीसाठी बोलाविले होते, असे पालकांचे म्हणणे होते.
सकाळी पालक शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोहचले. पण अधिकारी नसल्याने ते चांगलेच संतापले. पालकांचा रोष बघून पोलिसांचे पथक कार्यालयात दाखल झाले. पोलिसांनी पालकांचे व शिक्षणाधिका-यांचे दुरध्वनीवरून बोलणे करून दिले. पण शिक्षणाधिका-यांनी सांगितले की, अशी बैठक बोलाविलीच नव्हती, असे सांगितले.
पालकांकडे शिक्षणाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात येईल, यासंदर्भात व्हिडीओ रेकॉर्डिंग होती.
शिक्षणाधिकारी बैठकीसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत पालक चांगलेच संतप्त झाले. जोवर अधिकारी येऊन तोडगा काढत नाही, तोवर कार्यालयातच ठिय्या देणार असा निर्धार पालकांनी केला होता.त्याचदरम्यान शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार या कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी शिक्षणाधिका-यांना बोलावून घेतले. जवळपास तीन तास पालकांचा ठिय्या कार्यालयात होता. अखेर शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी कार्यालयात पोहोचले.
त्यांनी पालकांना शाळेवर कारवाई करतो व टीसीही परत घ्यायला लावतो असे लेखी दिल्यानंतरच पालकांनी कार्यालय सोडले. पालकांच्या शिष्टमंडळात अमोल फाये, अर्चना देशपांडे, स्वरेशा दमके, अभिषेक सिंह, प्रमोद अग्रवाल, गिरीश पांडे, अमित होशिंग, प्रवीण कांबळे, भवानी चौबे आदी उपस्थित होते.