
औरंगाबादेत म्युकर मायकोसिसमुळे ५३ बाधितांचा मृत्यू
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : औरंगाबाद – कोरोना संसर्गानंतर आता म्युकर मायकोसिसच्या रुग्णांमध्ये दिवसेंंदिवस वाढ होत असून एकट्या औरंगाबादेत आतापर्यंत ५३ जमांचे प्राण गेले आहेत. तर, या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्याही पावणे सहाशेवर पोहोचली आहे. खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत रुग्ण आणि मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरु होती. मात्र आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार म्युकरमायकोसिसने 53 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. म्युकरमायकोसिसच्या नव्या माहितीने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आला आहे. मात्र, म्युकर मायकोसिसचा विळखा घट्ट होत जातोय. त्यामुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यात भरीस भर म्हणजे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उचपार करणाऱ्यासाठी लागणारी इंजेक्शनची वाणवा भासू लागली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड हेळसांड आणि मनस्तापाला सामोरे जावं लागतंय.
आरोग्य यंत्रणेलाच माहिती नाही, काय चाललंय…?
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही रुग्णालयांची आरोग्य यंत्रणेलाच माहिती नव्हती. त्यामुळे रुग्णांची माहिती आतापर्यंत समोर आलेली नव्हती. अखेर या संदर्भातील माहिती यंत्रणेला मिळाली आहे. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची माहिती घेण्यात आली आहे. मात्र ही रुग्णालये नेमकी कोणती आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.

