
आंध्रप्रदेशाच्या चित्तूर जिल्ह्यातील रुईया रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने 11 जणांचा मृत्यू
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : हैदराबाद – आंध्रप्रदेशाच्या चित्तूर जिल्ह्यातील रुईया रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, असे आदेश मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्तूर जिल्ह्यातील रुईया रुग्णालयात 100 रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने रुग्णांना त्रास होऊ लागला. यामुळे अचानक रुग्णालयात धावपळ सुरू झाली. चेन्नईहून ऑक्सिजनचा टँकर तिरुपतीच्या दिशेने रवाना झाला. मात्र तो वेळेत पोहोचू शकला नाही. या टँकरला येण्यास 5 मिनिटे उशीर झाल्याने सोमवारी रात्री आठ-साडेआठच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. तर या रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. तसेच सध्या याठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतोय की नाही याची वेळोवेळी खबरदारी घेण्यात यावी, तज्ज्ञांकडून तंत्रज्ञांची माहिती करून घ्यावी, रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यावर लक्ष द्यावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

