
राजकारणी हिंदू-मुस्लिमात फूट पाडून पसरवित आहेत द्वेषाचा जहर,
मुंबईच्या शाहनवाजने कार व दागिने विकून गरजू लोकांना दिले आॅक्सीजन सिलेंडर
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,(वृत्तसंस्था) मुंबई : देशात कोरोनाची दुस-या लाटेत सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे. बेड न मिळाल्यामुळे, आॅक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक लोकांचा जीव जात आहे.
अशात मुंबईतल्या मालाडमधल्या मालवणीचे 32 वर्षांचे शाहनवाज शेख शक्य होतील तितक्या लोकांचं आयुष्य वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत.
पैसे कमी पडले तेव्हा त्यांनी स्वत:ची महागडी कार विकली आणि त्या पैशातून आॅक्सिजन सिलेंडर विकत घेऊन लोकांना मोफत आॅक्सिजन द्यायला सुरुवात केली. सिलेंडर कमी पडले तेव्हा त्यांनी आपली सोन्याची चेन आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी विकल्या.
शाहनवाज यांनी बीबीसीला सांगितलं, “आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव जातोय. अशात माज्याकडून जे शक्य आहे ते सगळं मी करतोय. उद्देश हाच आहे की शक्य तितक्या लोकांपर्यंत आॅक्सिजन पोहोचवावा आणि त्यांचा जीव वाचवावा. यासाठी मी माज्या कारसह काही मौल्यवान वस्तू विकल्या.”
शाहनवाज यांच्याकडून सिलेंडर घेतलेले गणेश त्रिवेदी म्हणतात, “या महामारीच्या काळात शाहनवाज भाई जे करत आहेत त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अनेक संस्था फक्त नावापुरत्या आहेत, पण लोकांची खरी सेवा तर शाहनवाज भाई करत आहेत. कोणतीही कागदपत्रं किंवा सिक्युरिटी डिपॉझिटशिवाय ते सिलेंडर देत आहेत.”
शाहनवाज यांनी मागच्या वर्षांपासूनच कोरोनाग्रस्तांची मदत करायला सुरूवात केली. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये सगळं बंद झाल्यानंतर रोजंदारीवर पोट भरणा-या लोकांचे दोन वेळेच्या जेवणाचे हाल सुरू झाले.
घरांची दुरुस्ती आणि इंटीरियर डिझायनिंगचं काम करणा-या शाहनावाज यांना जेव्हा मालवणीतले लोक त्रस्त दिसले तेव्हा त्यांनी आपल्या स्वकमाईचे पैसै खर्चून गरीबांना अन्नधान्य द्यायला सुरुवात केली.
शाहनवाज म्हणतात, “जेव्हा पहिल्यांदा लॉकडाउन लागला तेव्हा मालवणीतल्या रोजंदारीवर काम करणा-या लोकांचा कमाईचा मार्ग बंद झाला. माज्याकडे जे पैसे होते त्यातून मी लोकांना मदत करायला सुरुवात केली. याच दरम्यान मालवणीच्या एका मैदानावर मी स्थलांतरित मजुरांना बसलेलं पाहिलं. त्या दिवसांत लोक आपल्या गावी जाण्यासाठी संघर्ष करत होते. त्यासाठी त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागत होतं. हे करताना त्यांना उन्हातान्हात आपल्या मुलाबाळांसह उपाशी राहावं लागत होतं. ते पाहून मला फार त्रास झाला आणि मी त्या मजुरांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली.”
त्याच काळात शाहनवाजचे मित्र अब्बास रिझवी यांची बहीण आसमां आई बनणार होत्या. पण मुंबईला लागून असलेल्या मुंर्ब्यात त्यांची तब्येत खराब झाली आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. हॉस्पिटल शोधता शोधता मुंर्ब्याच्याच कळसेकर हॉस्पिटलबाहेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
अब्बास यांनी आपली कहाणी शाहनवाज यांना सांगितली तेव्हा त्यांनी ठरवलं की ते गरजू लोकांना मोफत आॅक्सिजन पुरवतील कारण आॅक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांचा जीव जात होता.
शाहनवाज म्हणतात, “परिस्थिती गंभीर होती आणि मला आसमांबदद्ल कळलं तेव्हा वाटलं की अनेकदा मोठ्या हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध नसतो, तेव्हा जर लोकांना वेळेवर आॅक्सिजन मिळाला तर त्यांचा जीव वाचू शकतो. आम्ही काही लोकांशी आणि डॉक्टरांशी बोललो आणि जाणून घेतलं की आॅक्सिजन सिलेंडर कसा मिळू शकतो. आम्ही ठरवलं की आम्ही आॅक्सिजन सिलेंडर आणू आणि लोकांना तोपर्यंत देत राहू जोवर त्यांना हॉस्पिटलकडून मिळत नाही.
“माज्याकडे जितके पैसै होते त्यातून मी 30-40 सिलेंडर विकत घेतले. सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली. लोकांना मला संपर्क करायला सुरुवात केली. आॅक्सिजनची गरज इतकी वाढली की 30-40 सिलेंडरही कमी पडायला लागले. तेव्हा मग गाडी आणि इतर वस्तू विकून पैसै उभे केले. त्यातून 225 सिलेंडर विकत घेतले. रोज रात्री आमची एक टीम सिलेंडर भरून आणायची म्हणजे आॅक्सिजन कमी पडायला नको.”
शाहनवाजचे मित्र सय्यद अब्बास रिझवी यांनी सांगितलं की, “आम्ही दोघं मिळून गरजूंची मदत करत होतो. काही कारणांस्तव नंतर मी शाहनवाज यांच्याबरोबर सतत काम करू शकलो नाही, पण ते अजूनही गरजवंतांची मदत करत आहेत. त्यांचं काम बघून खूप आनंद होतो. माज्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर लोकांना आॅक्सिजन पुरवण्याची योजना त्यांनी बनवली. आताही ते लोकांना प्राणवायू मिळवून द्यायला मदत करत आहेत.”
लॉकडाऊनमुळे कामावर परिणाम
लॉकडाऊनमुळे शाहनवाजच्या कामावरही परिणाम झाला. त्यांचं आॅफिस बंद झालं. सध्या ते घरून थोडंफार काम करत आहेत. कोरोनाची दुसरी लाट लोकांचं जगणं अस्ताव्यस्त करतेय तेव्हाही शाहनवाज गरजू लोकांची मदत करत आहेत, त्यांना मोफत आॅक्सिजन पुरवत आहेत.
गेल्या वर्षी शेकडो लोकांचा जीव वाचवणारे शाहनवाज कोरोना व्हायरसच्या दुस-या लाटेतही अनेकांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्याकडे 4000 रुपये किंमतीचे 225 सिलेंडर आहेत. हे सिलेंडर ते सतत भरून आणतात आणि गरजवंतांना देतात. एक सिलेंडर भरायला साधारण 300 रुपये खर्च होतात. ही मदत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी अशी शाहनवाज यांची इच्छा आहे.
ते म्हणतात “आॅक्सिजनच्या कमरतेमुळे आम्ही कितीही प्रयत्न केले तरी दिवसाला 40-50 सिलेंडरच भरून मिळतात. जर सगळे सिलेंडर भरून मिळाले तर आम्ही जास्तीत जास्त लोकांची मदत करू शकू. कधी कधी सिलेंडर भरायला 80-90 किलोमीटर लांब जावं लागतं. वाढत्या मागणीमुळे सिलेंडर भरण्याची किंमतही वाढली आहे. गेल्यावर्षी एक सिलेंडर भरायला 150 ते 180 रुपये लागायचे, आता त्याची किंमत 400 ते 600 रुपये झाली आहे. पण मला 300 रुपयात भरून मिळतो कारण त्यांना माहितेय की मी लोकांची सेवा करतोय.”
मुंबईतल्या वांद्रेमधल्या हिल रोडवर राहाणा-या एजाज फारूक पटेल यांचे 67 वर्षांचे वडील फारूख अहमद यांची तब्येत कोरोनाच्या दुस-या लाटेत बिघडली. त्यांना कोणत्याही दवाखान्यात बेड मिळत नव्हता. फारूख पटेल यांना आधीच मधुमेह आणि हृदयविकार होता.
एजाज पटेल हॉस्पिटलला चकरा मारत होते पण काही हाती लागत नव्हतं. आॅक्सिजनची अत्यंत गरज होती तेव्हाच एजाजला कोणीतरी शाहनवाज यांच्याविषयी सांगितलं, एजाज यांनी तातडीने शाहनवाज यांना संपर्क केला आणि तासाभरात त्यांना आॅक्सिजन मिळाला. त्यांचे वडील आता बरे झाले आहेत.
अनेकांना मिळतेय मदत
एजाज फारूक पटेल यांनी सांगितलं, “वडिलांची तब्येत 8 एप्रिल 2021 बिघडली तेव्हा त्यांची आॅक्सिजन लेव्हल 80-81 इतकी होती. हॉस्पिटलमध्ये ना बेड मिळत होता ना आॅक्सिजन. बेड मिळाला नाही तेव्हा त्यांना अलगीकरणात घरीच ठेवलं. मी आॅक्सिजन विकत घ्यायला तयार होतो पण मिळत नव्हता. मग मला शाहनवाज भाईंविषयी कळलं आणि त्यांनी लगेच आॅक्सिजन उपलब्ध करून दिला. 3 दिवस मला आॅक्सिजन सिलेंडर मिळाला नव्हता. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. ते खूप चांगलं काम करत आहेत. ते माज्याकडून पैसैही घेत नव्हते, पण मी जबरदस्तीने त्यांना पैसै घ्यायला लावले, म्हणजे सिलेंडर पुन्हा भरून ज्याला गरज आहे त्या माणसाकडे सिलेंडर पोहचू शकेल.”
मुंबईतल्या मालाड इस्ट भागातल्या काठियावाडी चौकीचे गणेश त्रिवेदी म्हणतात त्यांनी अर्ध्या रात्री शाहनवाज यांचं दार ठोठावलं आणि त्यांना आॅक्सिजन मिळाला. गणेश आपल्या 75 वर्षांची आजी कंचन बेन डेडिया यांच्या उपचारासाठी वणवण फिरत होते. अनेक संस्थांकडेही फे-या मारल्या पण आॅक्सिजन शाहनवाज यांनी मिळवून दिला.
ते म्हणतात, “माझी आजी आजारी होती. तिला कोणत्याही दवाखान्यात जागा मिळत नव्हती. ज्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला तिथले पैसे आम्ही भरू शकत नव्हतो. आम्ही अनेक स्वयंसेवी संस्थांकडे गेलो. पण त्या सगळ्या नावापुरत्याच आहेत. तिथे सगळ्या प्रकारची कागदपत्रं मागत होते. मग मी 21 एप्रिलला शाहनवाज भाईंकडे गेलो. त्यांनी मला कोणतीही कागदपत्रं न मागता, फक्त आधार कार्डची झेरॉक्स घेऊन रात्री साडे बारा वाजता आॅक्सिजन सिलेंडर दिला.” इतकंच नाही, स्थानिक नेतेही कोरोनाग्रस्तांची मदत करायला शाहनवाज यांची मदत घेत आहेत.
काँग्रेसचे उत्तर मुंबई जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू शिरसाठ यांनी सांगितलं, “आम्ही पॅन्डेमिक टास्क फोर्ससाठी हेल्पलाईन नंबर दिला होता. त्यानंतर आमच्याकडे मदतीसाठी फोन येतात. जर कोणाला आॅक्सिजनची गरज असेल तर आम्ही शाहनवाज यांच्याकडून मिळवून देतो. गेल्या काही दिवसात मी अनेक लोकांना आॅक्सिजन मिळवून दिला आहे. रात्री 1 वाजताही फोन केला तरी शाहनवाज भाऊंनी आमचा फोन उचलला आहे आणि आमची मदत केली आहे.”
दिनेश अन्नप्पा देवाडिगा यांच्या 63 वर्षांच्या वडिलांना जेव्हा कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हाही शाहनवाज यांची मदत त्यांच्यापर्यंत पोहचली. मालाडच्या करवाडी भागात राहाणारे दिनेश म्हणतात की, “माझे वडील आजारी होते, कुठे मदत मिळत नव्हती ना हॉस्पिटलमध्ये जागा होती. तेव्हा मला माज्या शेजारच्यांनी शाहनवाज यांच्याविषयी सांगितलं. 16 एप्रिलला मी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी काहीही मोबदला न मागता माझी मदत केली. आता माज्या वडिलांना दवाखान्यात बेड मिळाला आहे. आमच्या अडचणीच्या काळात शाहनवाज भाईंनी आमची खूप मोठी मदत केली.”
हारिश शेख म्हणतात की, “खूप सारे लोक सोशल मीडियावर मदतीचं आश्वासन देत असतात. पण त्यातल्या बहुतांश लोकांचे फोन बंद असतात. आम्ही जेव्हा शाहनवाज यांच्या मोबाईलवर मेसेज केला तेव्हा मला 15 मिनिटात रिप्लाय आला. आॅक्सिजनची गरज आहे असं सांगितल्यावर मला 15 मिनिटात आॅक्सिजन मिळाला.”
शाहनवाज यांचं कुटुंब उत्तर प्रदेशातल्या आजमगढमधलं असलं तरी त्यांचा जन्म मुंबईतच झाला आहे. मुंबईत ते आपली पत्नी, मुलगी, भाऊ आणि बहिणीसोबत राहातात. त्यांनी कोरोना महामारीच्या आधीच युनिटी अँड डिग्निटी नावाने संस्था बनवली होती, पण या साथीच्या काळात ते गरजू लोकांची मदत करण्यासाठी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत.

