
कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव, हरिद्वारमध्ये दोन दिवसांत हजार जणांना संसर्ग
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था/हरीद्वार : देशात कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यात विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये कोरोनाचा मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हरिद्वारमध्ये दोन दिवसात एक हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. हरिद्वारमधील गंगेच्या काठावर होत असलेल्या कुंभमेळ्यात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हरिद्वारमध्ये मंगळवारी ५९४ म्हणजे जवळपास ६00 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी हरिद्वारमध्ये ४0८ रुग्ण आढळले होते. सध्या हरिद्वारमध्ये २ हजार ८१२ रुग्ण उपचार घेत असून, पहिल्या दोन शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
ना मास्क, ना थर्मल स्क्रिनिंग
माध्यमांनी कुंभमेळा सुरू असलेल्या परिसरात कोरोना नियमांच्या पालनाबद्दलची पाहणी केली. तेव्हा तिथे कुठेही मास्कची सक्ती करताना आढळून आले नाही. रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केले जात नसल्याचे दिसले. महत्त्वाचे म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. मात्र, विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणी रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आल्याचे दिसून आले.
याचा परिणाम संपूर्ण देशावरच होणार -अस्लम शेख
सरकार राजकारण करण्यासाठी कुंभमेळा आणि धार्मिक कार्यक्रम घेतंय. याचा विस्फोट होणार आहे. हे कोरोना रुग्ण किती मोठ?ा संख्येने निघणार याची आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही दखल घेतलेली आहे. महाराष्ट्र सरकारलाही याचा विचार करावा लागेल. जेव्हा हे परप्रांतीय मुंबईत येतील, त्याचा परिणाम होईल. त्यामुळे त्याचाही विचार नव्या गाईडलाईन्स तयार करताना केला जाईल.
कारण देशात भावूक होऊन काहीतरी करायचे असे सुरू आहे. इतर राज्यात नेते आणि मंत्री वैज्ञानिकांचे ऐकायचे नाही, डॉक्टरांचे ऐकायचे नाही आणि स्वत: मनाने जे काही करत आहे, त्याचा परिणाम संपूर्ण देशावरच होणार आहे, असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कुंभमेळ्याविषयी बोलताना दिलेला आहे.

