
आता सोसवेना विरहाचा भार, चार वेळा पळून गेली नार
विदर्भ वतन,नागपूर : महाविद्यालयात शिकताना त्यांचे प्रेम झाले. प्रेमात पडलेली मुलगी चार वेळा प्रियकरासोबत पळून गेली. त्यानंतर त्यांच्यात बिनसले म्हणून मुलाने बोलणे बंद केले. मुलीने लग्नाचा तगादा लावताच मुलाने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या मुलीने प्रियकराविरुद्ध अत्याचाराची तक्रार दिली. सोहन देवचंद जगणे (२५) रा. बालाघाट, असे आरोपी मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मूळचा मध्यप्रदेश बालाघाट येथे राहणारा सोहन हा शिकण्यासाठी नागपुरात आला. त्याचे आईवडील शेती करतात. व्हीएमव्ही महाविद्यालयात शिकत असताना त्याच महाविद्यालयात शिकत असलेल्या १६ वर्षांच्या मुलीसोबत सोहनची मैत्री झाली. मुलीचे वडील हातमजुरीचे काम करतात. दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. दोघांनीही लग्न करण्याचा विचार केला. पण, मुलगी अल्पवयीन होती आणि घरचेही लग्नास तयार होणार नाही, या विचाराने ते ७ जुलै २0२0 ला मुलगी मध्यरात्री घरचे झोपले असताना प्रियकरासोबत बालाघाटला पळून गेली. मुलगी पळून गेल्याचे आईवडिलांना कळताच त्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. दोन महिने प्रियकरासोबत राहून मुलगी परत आली. काही दिवस घरी राहिल्यानंतर तिला पुन्हा प्रियकराची आठवण आल्याने ती पुन्हा प्रियकरासोबत पळून गेली. वर्षभरात मुली तीन वेळा प्रियकरासोबत पळून गेली. त्याच्यासोबत राहून ती वारंवार घरी परत यायची. तो तिला पळवून बालाघाटला न्यायचा आणि परत आणून द्यायचा. दरम्यान, मुलीने त्याला लग्नाचा तगादा लावला. पण, यावरून त्यांच्यात बिनसले. त्याने मुलीशी बोलणे बंद केले. त्यामुळे ती स्वत: दोनदा बालाघाटला जाऊन आली, पण तो तिला भेटला नाही. मोबाईलवर त्यांचे बोलणे झाले असता त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. दरम्यान, या प्रकारामुळे सर्वत्र बोभाटा झाला होता. मुलीचे आईवडीलही तिला प्रियकराशी लग्न करून घेण्यास सांगत होते. पण, त्याने नकार दिल्याने ती चिडली. तिने याप्रकरणी पारडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपी मुलावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

