
लढा देऊ अन्यायाला……
रंग सावळा सावळा
मन परंतु निर्मळ ।
जननीच्या संस्काराने
नष्ट झाली मरगळ ।।
भारतीय बंधू सारे
मजसाठी प्रिय फार ।
जाती धर्मांच्या बेडीला
नाही करत स्वीकार ।।
मान्य नाही मज नारी
आहे अबला म्हणून ।
चालविते सृष्टी तीच
जीव जन्माला घालून ।।
मज पामरास काय
सांगा कळणार ज्ञान ।
फक्त जाणतो साऱ्यांना
नित्य आपल्या समान ।।
रंगभेद,धर्मभेद
प्रांतवाद,भाषावाद ।
याचमुळे देश माझा
होणे आहे बरबाद ।।
किती महंत जन्मले
किती जन्मणार पुन्हा ।
तरी आपल्या हाताने
रोज घडणार गुन्हा ।।
जरा आठवा वीरांना
त्यांचे कार्य किती थोर ।
त्यांनी कुठे आणीयले
जाती धर्मांना समोर? ।।
एक होऊ त्यांच्यासम
लढा देऊ अन्यायाला ।
प्रेम करणे शिकवू
सारे मिळून जगाला ।।
©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,तरनोळी
ता.दारव्हा,जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

