
विदर्भ वतन /नागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढविला. झपाट्याने कोरोना व्हायरस वाढत असल्याने वाठोडा येथील नागरिकांसमोर बकरामंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाठोडा येथे बकरामंडी सुरू करण्याच्या परवानगीला शिवसेना आणि हिंदू सेनेने विरोध दर्शविला आहे.
मोमिनपुरा येथील बकरामंडी मौजा वाठोडा येथील गिड्डोबा मंदिराजवळील जागेत स्थानांतरीत करण्याचा आदेश मनपा कार्यालयातुन ४ मे रोजी निर्गमीत झाला.
या आदेशामुळे परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ही जागा सिम्बॉयसिस क्वारंटाईन सेंटरला लागून आहे तसेच बाजूला मोठ्या प्रमाणात लोक वास्तव्यात आहेत. बकरामंडीत जनावरे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले जातील त्यामुळे नको त्या लोकांची येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू राहील. क्वारंटाईन सेंटर जवळ असल्यामुळे या भागात संशयित रूग्णांची तसेच त्यांना पुरविण्यासाठी येणार्या इतर लोकांची सतत वर्दळ राहते त्यामुळे येथील भितीचे वातावरण निर्माण झाले असून बकरामंडीला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
येथील नागरिक, शिवसेनेचे रूपेश बांगडे आणि हिंदू सेनेचे जिल्हा अध्यक्ष गौरव गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त आदींना निवेदन देवून हा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली.

