
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.
२०१४ सालच्या जानेवारी महिन्यात १० ते १२ या तारखांना महाड येथे झालेल्या १५व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते. जयंत पवार यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी मिळाला. ‘प्रयोग मालाड’ या नाट्यसंस्थेने १३-१४ ऑक्टोबर २०१८ या दिवसांत ‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’ या नावाखाली एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धांच्या अंतिम फेरीत जयंत पवार यांच्या १४ एकांकिकांमध्ये आपआपसात सामना झाला. हा कार्यक्रम मुंबई-बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे मिनी थिएटर येथे होता. अशा स्पर्धांचे हे पाचवे वर्ष होते.
जयंत पवार यांनी लिहिलेली नाटके
अधांतर,काय डेंजर वारा सुटलाय , टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका)
पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक),माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक), होड्या (एकांकिका)

