
देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये चार हजारांनी घट
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – देशात जीवघेण्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरूच आहे. मात्र रविवारी दिवसभरात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ४ हजारांनी घट झाल्याचे पाहायला मिळाले. देशात ३५ हजार ४९९ नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली, तर ४४७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तसेच कालच्या दिवसात देशात ३९ हजार ६८६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यासह भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी १९ लाख ६९ हजार ९५४ वर पोहोचला आहे. यापैकी ३ कोटी ११ लाख ३९ हजार ४५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख २८ हजार ३०९ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ४ लाख २ हजार १८८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनसार, रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत देशात लोकांना कोरोना लसीचे ५० कोटी ६८ लाख १० हजार ४९२ डोस देण्यात आले आहेत. यापैकी ५५ लाख ९१ हजार ६५७ डोस एका दिवसात देण्यात आले. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले की, भारतात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काल १३ लाख ७१ हजार ८७१ नमुने तपासण्यात आले, तर आतापर्यंत एकूण ४८ कोटी १७ लाख ६७ हजार २३२ नमुने तपासण्यात आले आहेत.

