
हरिद्वारमध्ये गंगा नदीत बुडून मुंबईच्या ३ विद्यार्थिनींचा मृत्यू
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई – वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आणि उत्तराखंडला सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील ३ विद्यार्थिनींचा हरिद्वार येथे गंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नदीच्या प्रवाहाबरोबर या मुली वाहून गेल्या. पोलीस त्यांचा शोध घेत असून अद्याप त्यांचे मृतदेह सापडलेले नाहीत.
मुंबईतील कांदिवली, बोरिवली आणि मीरा रोडमध्ये राहणाऱ्या ५ मित्र-मैत्रिणींचा ग्रुप ३० जुलैला उत्तराखंडमधील हरिद्वारला सहलीसाठी गेला होता. त्यात ४ मुली आणि एका मुलाचा समावेश होता. हे सर्वजण मेडिकलचे विद्यार्थी आहेत. हरिद्वारला गेल्यानंतर बुधवारी ते स्नानासाठी गंगा नदीत उतरले होते. त्यावेळी त्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे यातील ३ विद्यार्थिनी नदीच्या प्रवाहात वाहत गेल्या. मात्र सुदैवाने करण मिश्रा आणि आणखी एक तरुणी यातून बचावले. त्यांनी याची माहिती हॉटेल मालकाला दिली. त्यानंतर हॉटेल मालकाने पोलीस ठाण्याला माहिती देताच पोलिसांनी शोधकार्य हाती घेतले. परंतु त्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. या घटनेमुळे या मुलींच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

