पटोलेंच्या ‘नाना’गिरी ने आघाडी धास्तावली?

375

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्ये करत महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप करताना नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आहे. दरम्यान वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला असताना नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास लावण्यात आला असल्याचे म्हटले आहे. माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर होते असे सांगत नाना पटोले यांनी वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे सांगितले आहे. पाळत ठेवण्याबाबत माझा सरकारवर कोणताही आरोप नसून मुंबईत आल्यावर यावर सविस्तर प्रतिक्रिया देईन असे नाना पटोले म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माज्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे. सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचे सांगितले आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे, असं नाना पटोले यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचे कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेस उभी होत असल्याचे त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरू आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजºयात आणण्याचा प्रयत्न करणार, असाही आरोप यावेळी त्यांनी केला.
सोबत राहून पाठीत सुरा खुपसला जात आहे लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. कार्यकर्त्यांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितले. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही, असा चिमटा पटोले यांनी उद्धव ठाकरेंना काढला.
यावेळी अजित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात.. आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचे ऐकायचे की नाही ते त्यांनी ठरवायचं. कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे, असेही नाना पटोले म्हणाले होते.